परिचय
जिल्हा परिषद अकोला इतिहास
भारतात फार प्राचीन काळापासुन म्हणजे मौर्य, गुप्त इत्यादींच्या काळातही स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात होत्या व खेडे हा स्थानिक कारभारातील प्रमुख घटक होता. चोल राजांनी तर स्थानिक स्वराज्य संस्थाना विशेष उत्तेजन दिले होते. मनुस्मृती नारदस्मृती मध्ये ग्रामस्तरावर कार्य कराणा-या ग्रामपंचायतीसदृष ‘न्यायपंचायत’ या संस्थेचा उल्लेख आहे तर, इ.स. पूर्व तिस-या शतकात भारतात आलेल्या मॅगेस्थिनीसने केलेल्या लिखाणात नगर प्रशासनाचे वर्णन आले आहे.
भारताच्या आधुनिक इतिहासात लॉर्ड रिपनने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्थापनेबाबत केलेले प्रयत्न व त्याने संमत केलेला इ.स.1882चा स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा लक्षात घेता लॉर्ड रिपन यास यथार्थतेने ‘स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक’ असे म्हटले जाते.
स्वातंत्रयोतर काळात पंचायतराज व्यवस्थेचे स्वरूप व कल्पना निश्चित करण्यासाठी मध्यवर्ती शासनाने1957मध्ये बलवंतराय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केली होती. मेहता समितीने आपला अहवाल1958मध्ये सादर केला. या समितीने लोकशाहीच्या विकेंद्रिकरणावर भर दिला व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्रिस्तरीय रचनेची शिफारस केली. ग्रामीण स्थानिक संस्थांच्या या त्रिस्तरीय रचनेसच ‘पंचायतराज’ असे संबोधले जाते.
बलवंतराय मेहता समितीच्या अहवालाचा विचार करून पंचायतराज पध्दती महाराष्ट््रात कशा प्रकारे सुरू करता येईल किंवा लोकशाहीच्या विकेंद्रिकरणाची मेहता समितीची संकल्पना महाराष्टात कशा प्राकारे प्रत्यक्षात आणता येईल, याचा संखोल अभ्यास करण्यासाठी महाराष्ट राज्याचे त्यावेळचे महसूल मंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली1960मध्ये एक समिती स्थापन करण्यात आली. या समितीने1961मध्ये आपला अहवाल सादर केला. या सपितीच्या शिफारसीनुसार महाराष्ट जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम1961संमत करण्यात आला व दिनांक1मे1962पासुन पंचायतराज व त्या अंतर्गत त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थांची पध्दती स्विकारण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थांचे हे तीन स्तर खालील प्रमाणे—
अकोला जिल्हा सर्वसाधारण माहिती
अकोला जिल्हा महाराष्ट्राच्या पूर्व भागात आहे.या जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र अकोला हे आहे.अकोला जिल्हा हा विदर्भाच्याअमरावती प्रशासकीय विभागात येतो. जुलै १, इ.स. १९९८ रोजी महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले. त्यामुळे अकोला व वाशिम हे दोन नवे जिल्हे निर्माण झाले.जिल्ह्याच्या सीमा उत्तरेस व पूर्वेस अमरावती जिल्हा, दक्षिणेसवाशिम जिल्हा तर पश्चिमेस बुलढाणा जिल्हा आहे.
विभाग | माहिती |
---|---|
अकोला जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र :- | 5,42,700 हेक्टर |
एकूण तालुके :- | 7 |
अंशतः आदिवासी पंचायत समित्या :- | 2 |
एकूण महसुल गावाची संख्या :- | 992 |
एकूण लोकसंख्या (२०११ जनगणना) :- | 18,18,617 (2011) |
पंचायत समिती संख्या :- | 7 |
ग्रामपंचायत :- | 534 |
अंगणवाडी संख्या :- | 1315 |
पशुवैदयकीय दवाखाने :- | 69 |
श्रेणी 1 :- | 29 |
श्रेणी 2 :- | 40 |
प्राथमिक आरोग्य केंद्र :- | 31 |
उपकेंद्र :- | 176 |
प्राथमिक शाळा :- | 901 |
माध्यमिक शाळा :- | 11 |
भौगोलिक स्थिती (तालुके) | |
अंशतः आदिवासी तालुके :- | पातूर, अकोट |
हवामान :- | कोरडे व उष्ण |
पर्जन्यमान :- | सरासरी ७०० ते ७५० मि.मी. |
नदी व खोरे :- | काटेपूर्णा, मोर्णा, खडकपूर्णा, उमा नदी, वान नदी, विद्रुपा नदी, पूर्णा नदी, मन नदी, महेश नदी, भिकुंड नदी |
धरणे :- | काटेपूर्णा धरण, वण, दगडपरवा, सुकळी, पोपटखेड धरण, शहानूर धरण, चोंडी धरण |
जिल्ह्यातील पर्यटनाची स्थळे | |
थंड हवेचे ठिकाण :- | शहानूर धरण |
पर्यटन स्थळे :- | नरनाळा किल्ला, राजेश्वर मंदिर, असदगड किल्ला, अंत्री मलकापूर |
मंदीर/देवस्थान :- | राजेश्वर मंदिर, खोलेश्वर मंदिर, रुद्रायणी (च.) मंदिर, मुंडगाव, नरसिंह महाराज, अकोट, अकोली जहा. बालादेवी, बाळापूर, पातूर रेणुका देवी, कुरणखेड चंडिका माता इ. |
शेती विषयक प्रसिद्ध बाबी | डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला |
गड किल्ले | नरनाळा किल्ला, असदगड किल्ला |
ऊर्जा केंद्र | पारस औष्णिक विद्युत केंद्र, बाळापूर अकोला |
अधिक माहिती
भूरूपे
अकोला जिल्ह्यात विविध भूरूपे आहेत. पूर्णा नदीच्या खोऱ्यायाचा बहुतेक भाग सपाट मैदानाचा आहे. जिल्ह्यात उत्तर भागात गाविलगडचे डोंगर, तर दक्षिण भागात अजिंठ्याचे डोंगर आहेत. जिल्ह्याच्या उत्तरेस नर्नाळा किल्ला आहे. भूरूपांच्या उंचसखलपणावरून प्राकृतिक रचना समजते.
जिल्ह्यातील तालुके
- अकोट
- अकोला तालुका
- तेल्हारा
- पातूर
- बार्शीटाकळी
- बाळापूर
- मुर्तिजापूर
प्राकृतिक विभाग
- गाविलगडचा डोंगराळ प्रदेश – या विभागात जिल्ह्यातील तेल्हारा व अकोट तालुक्यांचा उत्तर भाग येतो.
- अजिंठ्याचा डोंगराळ व पठारी प्रदेश – जिल्ह्याच्या दक्षिण भागात अजिंठ्याचे डोंगर आहेत. हा भाग बराचसा पठारी आहे. यात पातूर व बार्शीटाकळी तालुक्यांचा भाग येतो.
- पूर्णा नदीचा सखल प्रदेश – या प्रदेशात जिल्ह्याचा मध्यभाग येतो. यात मुर्तिजापूर, अकोला, बाळापूर तसेच अकोट व तेल्हारा तालुक्यांचा दक्षिण भाग यांचा समावेश होतो. बार्शीटाकळी तालुक्याचा उत्तर भागही यात येतो.
नद्या
- अकोला जिल्ह्यातील मुख्य नदी पूर्णा आहे.
- पूर्णा नदीस शहानूर, पठार, विद्रूपा, आस, इत्यादी नद्या उत्तरेकडून येऊन मिळतात.
- उमा, काटेपूर्णा, मोर्णा व मन ह्या नद्या दक्षिणेकडून येऊन मिळतात.
- निर्गुणा ही मन नदीची उपनदी जिल्ह्यातून वाहते.
- वाशीम जिल्ह्यात काटेपूर्णा नदीचा उगम आहे. ही नदी बार्शीटाकळी, मूर्तिजापूर व अकोला या तालुक्यांतून वाहते.
- मूर्तिजापूर तालुक्यात सांगवी या ठिकाणाजवळ पूर्णा व उमा नद्यांचा संगम झाला आहे.
- मन व म्हैस या नद्यांचा संगम बाळापूर जवळ झाला आहे.
हवामान
अकोला जिल्हा समुद्रापासून दूर आहे. जिल्ह्याचे हवामान साधारणपणे उष्ण व कोरडे आहे. उन्हाळा फार कडक असतो. मे महिन्यात तापमान महत्तम असते. डिसेंबर महिन्यात तापमान कमीतकमी असते. उन्हाळ्यात दिवसा तापमान बरेच वाढत असले तरी रात्री ते कमी होते. जिल्ह्यातील बाळापूर, अकोला, मूतिजापूर तालुक्यांत कमी पाऊस पडतो.
नैसर्गिक संपत्ती
- अकोला जिल्ह्यात गाविलगड व अजिंठ्याच्या डोंगराळ भागात जास्त वने आहेत.
- वनात साग, ऐन, खैर, अंजन, इत्यादी वृक्ष आढळतात.
- मोर, रानकोंबडा, इत्यादी पक्षीही वनांत आहेत.
- पातूर तालुक्यात साग, चंदन, तसेच चारोळीचे उत्पादनही होते.
- जिल्ह्यात काटेपूर्णा अभयारण्य आहे.
जिल्हा परिषदेचे मूलभूत कार्य
- ग्रामीण भागात अत्यावश्यक सेवा आणि सुविधा पुरविणे.
- ग्रामीण भागात शाळा व ग्रंथालये स्थापन करून ती व्यवस्थितपणे चालविणे.
- ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि रुग्णालये सुरू करणे.
- ग्रामीण भागात अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांसाठी विकास योजनांची अंमलबजावणी करणे.
- ग्रामीण रोजगार राबविण्यासाठी लघुउद्योग सुरू करण्यासाठी उद्योजकांना प्रोत्साहन देणे.
- ग्रामीण भागात पूल, रस्ते बांधणे व त्यांची देखभाल करणे.
- रोजगारनिर्मिती करणे.
जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्या
- स्थायी समिती
- जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती
- वित्त समिती
- बांधकाम समिती
- कृषी समिती
- पशुसंवर्धन समिती
- शिक्षण समिती
- आरोग्य समिती
- महिला व बालकल्याण समिती
- समाज कल्याण समिती